![]()
शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून अधिकृत व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र असे असूनही या 6 पैकी एकाही खासदाराने पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. बैठकीकडे फिरवलेल्या या पाठामुळे सदर खासदार फुटल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात असून, यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत. कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी पक्षात सर्व खासदार आपल्यासोबत असून आमचा आमच्या खासदारांवर अंधविश्वास असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांचा अंधविश्वासानेच त्यांचा विश्वासघात केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आमच्या 6 लोकांनी स्वतःला विकले- संजय राऊत शिवसेनेत फूट पडली नसून बंडखोर खासदारांनी स्वत:ला विकल्याची टीका संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केली. मी शिवसेनेत ही फूट झाली असे मानत नाही. माणूस विचारांशी बांधीलकी दाखवून फुटतो. एखाद्याने स्वत:ला बाजारात विकण्यासाठी उभे केले आणि कुणी खरेदी केले तर त्याला फुटणे म्हणत नाही. त्याला विकणे म्हणतात. तसे आमचे 6 लोक दोन दिवसांपूर्वी बाजारात उभे राहिले. त्यांनी स्वत:ची बोली लावली आणि त्या बोलीवर त्यांना विकत घेतले गेले. कोणताही महान विचार घेऊन ते फुटलेले नाहीत, अशी सडेतोड टीका राऊत यांनी केली आहे.
Source link
तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले!:महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, फुटलेल्या खासदारांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल