Headlines

तहानलेल्या ठाण्याचं पाणी 'ॲमेझॉन'च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?




ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ‘ॲमेझॉन’चा मेगा डेटा सेंटर प्रकल्प आता ठाण्यात उभारण्याचा घाट घातला जात आहे. या नव्या मेगा डेटा सेंटर प्रकल्पामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, या महाकाय प्रकल्पामुळे प्रत्यक्षात केवळ 60 जणांनाच रोजगार मिळणार असून, त्याबदल्यात सुमारे 600 ठाणेकरांच्या जीवावर आणि आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांची टीका ठाणे शहरात सध्या भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वतः अर्थसंकल्पात शहराला 30 एम.एल.डी पाण्याची कमतरता असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. असे असताना, असे असताना तहानलेल्या ठाणेकरांच्या हक्काचे तब्बल 12 एम.एल.डी. पाणी या ॲमेझॉन डेटा सेंटरच्या घशात ओतले जाणार आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. पाण्याच्या प्रचंड वापराव्यतिरिक्त या प्रकल्पामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिले. या महाकाय डेटा सेंटरसाठी अमर्याद विजेचा वापर केला जाईल, ज्यामुळे ऊर्जेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच, या प्रकल्पामधून दिवस-रात्र होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मोठा आणि नाहक त्रास आजूबाजूच्या स्थानिक ठाणेकरांना सहन करावा लागेल, अशी भीतीही आव्हाड व्यक्त केली आहे. आंदोलनाचा इशारा या सर्व कारणांमुळे या विनाशकारी डेटा सेंटरला आपला तीव्र विरोध राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात केवळ पालिकेच्या सभागृहातच आवाज उठवणार नाही, तर जनतेच्या दरबारात जाऊन या प्रकरणाविरुद्ध उग्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला आहे. याशिवाय, ज्यांना हा प्रकल्प हवा आहे, त्या संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घरे याच ॲमेझॉनच्या डेटा सेंटरशेजारी बांधावीत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. जीवाशी खेळणारा हा विनाशकारी प्रकल्प शहराला हवाच कशाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही या प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पावरून पालिका प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. हा महाकाय प्रकल्प ठाणेकरांच्या थेट मुळावर उठला असून, यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय नुकसान होणार असल्याची तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा विनाशकारी प्रकल्प शहराला हवाच कशाला? असा संतप्त सवाल करत, या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्यासोबतच न्यायालयात जाऊन कायदेशीर लढा देण्याचा ठाम निर्धार प्रधान यांनी व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या या नव्या आरोपांमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. एकीकडे बहुचर्चित टीडीआर घोटाळ्यावरून आधीच पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना, आता त्यात या नव्या ‘डेटा सेंटर’च्या वादाची भर पडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा ॲमेझॉन डेटा सेंटरचा मुद्दा ठाणे महानगरपालिकेसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *