Headlines

दोन तृतीयांश बहुमतासाठीच पक्षफोडी?:बाळासाहेबांनी कधीही अशी भित्रेपणाची शिकवण दिली नव्हती; 'ऑपरेशन टायगर'वर संजय सिंहांचा गंभीर आरोप




दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर आता आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी भाजपवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित वापरावर जोरदार टीका केली. “संसदेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “इतिहास शूर लोक लिहितात, भित्रे नाही” दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह म्हणाले, “इतिहास नेहमी शूर लोक लिहितात, भित्रे लोक इतिहास घडवत नाहीत. जर कोणी ED, CBI किंवा पोलिसांच्या भीतीपोटी दुसऱ्या पक्षात जात असेल, तर तो आपल्या मतदारसंघातील जनतेला कधीच सामोरे जाऊ शकणार नाही.” त्यांनी शिवसेना खासदारांना अप्रत्यक्ष आवाहन करत म्हटले की, शिवसैनिकांना देशभरात धाडसी म्हणून ओळखले जाते. “ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात. बाळासाहेबांनी कधीही अशी भित्रेपणाची शिकवण दिली नव्हती की, पक्षाशी आणि मतदारांशी विश्वासघात करून दुसऱ्या पक्षात जावे,” असा टोला त्यांनी लगावला. “लाखो मतदारांचा विश्वास तोडणे योग्य नाही” संजय सिंह यांनी पक्षांतराच्या नैतिकतेवरही प्रश्न उपस्थित केले. “लाखो लोकांनी तुम्हाला मतदान केले आहे. त्यांनी एका विचारासाठी, एका पक्षासाठी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. अशा वेळी तपास यंत्रणांच्या दबावाखाली शरण जाणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, जनतेने दिलेला कौल हा वैयक्तिक नसून पक्ष आणि विचारधारेशी जोडलेला असतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे म्हणजे मतदारांच्या विश्वासालाच तडा देणे आहे. “दोन तृतीयांश बहुमताचा मोठा राजकीय डाव?” संजय सिंह यांनी सर्वात महत्त्वाचा आरोप संसदेतील संख्याबळाशी संबंधित केला. “सध्या एकच उद्दिष्ट दिसत आहे, ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत पूर्ण करणे. त्यासाठी प्रत्येक मार्गाने विरोधी पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, सत्ताधारी NDA आगामी काळात काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संसदेत अधिक मजबूत संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना (उबाठा) आणि इतर प्रादेशिक पक्षांमधील घडामोडींना जोडून पाहिले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’वर विरोधकांची एकजूट उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याच्या चर्चांनंतर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. याआधी काँग्रेसचे नाना पटोले, जयराम रमेश, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे रोहित पवार, शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांनीही भाजपवर “लोकशाहीची हत्या”, “ऑपरेशन बाजार” आणि “हुकूमशाही” असे आरोप केले आहेत. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून, विरोधी पक्षांतील नेते स्वतःच्या नेतृत्वावरील नाराजीमुळे आणि राजकीय भवितव्याच्या चिंतेमुळे पक्ष सोडत असल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्रातील घडामोडींना राष्ट्रीय संदर्भ २०२२ मध्ये शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव सेनेच्या खासदारांबाबत सुरू असलेल्या हालचालींमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातही ‘दोन तृतीयांश बहुमतासाठी विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे का?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत संजय सिंह यांनी केलेले वक्तव्य या वादाला आणखी धार देणारे ठरले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *