![]()
वाघूर धरणावरून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपंपांची लाखो रुपयांची तांब्याची केबल चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या या केबल चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी थेट पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी ग्रामविकास व बहुजन कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनीही पोलीस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चोरट्यांचा तात्काळ छडा लावण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. नेरी बुद्रुक, नेरी दिगर, चिंचखेडा, हिवरखेडा बुद्रुक, केकत निंभोरा, हिंगणा, पळसखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांनी पिकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वाघूर धरणात वीजपंप बसवले आहेत. धरणातून लांब अंतरावर पाणी नेण्यासाठी व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी महागड्या तांब्याच्या केबलचा वापर करावा लागतो. मात्र, तांब्याचे वाढलेले बाजारभाव पाहून चोरटे रात्रीच्या वेळी या केबल कापून नेतात. आतापर्यंत लाखो रुपयांची केबल चोरीला गेली असून जामनेर पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही अद्याप चोरट्यांचा छडा लागलेला नाही. संतप्त शेतकऱ्यांनी मांडले आपले गाऱ्हाणे चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा केबल चोरीची मोठी घटना घडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, बापू पाटील, व्ही.एच. पाटील, शिवाजी पवार, जितेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Source link
वाघूर धरणावरून केबलची चोरी; शेतकऱ्यांनी घेतली एसपींची भेट:चोरट्यांचा अद्यापही छडा नाही; मंत्री गिरीश महाजनांचे तपासाचे निर्देश