Headlines

धुवांधार पावसातही अलंकापुरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली:इंद्रायणी नदीला महापूर; नदीघाट पूर्णपणे बंद, दर्शन मार्गात बदल




मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना असूनही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आळंदीत हजारो भाविक दाखल झाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी 3 वाजता देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आळंदी आणि परिसरात धुवांधार पाऊस सुरू असल्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून नदीला पूर आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात नागरिकांना व भाविकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रशासन आणि देवस्थान कमिटीकडून वारकऱ्यांना शक्य असल्यास थेट पुण्यातूनच वारीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक जण आळंदीत दाखल झाले आहेत. पूरस्थितीमुळे दर्शन मार्गात बदल महापुरामुळे नियोजित दर्शनबारीचा मार्ग बाधित झाल्याने प्रशासनाने भाविकांच्या दर्शनासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. भाविकांना आता पोलीस ठाणे आणि चावडी चौक मार्गे नवीन दर्शनबारीच्या इमारतीकडे वळविण्यात येत आहे. रेनकोट, छत्री आणि प्लास्टिकच्या आडोशाने अनेक भाविक तासनतास दर्शनरांगेत उभे आहेत. पावसाचा जोर वाढल्याने प्रदक्षिणा मार्गावर होणारे पारंपरिक फेर आणि फुगड्यांचे कार्यक्रम यंदा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *