![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच विधानभवनात सीमाप्रश्नासंदर्भातील एका बैठकीला हजेरी लावली. यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली. विशेष म्हणजे, ही बैठक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दालनात पार पडली. यावेळी शिंदेंनी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानाने स्वागत केले. मात्र, या सदिच्छा भेटीवरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “ज्या गद्दाराने आमचे हक्काचे सरकार पाडले, त्यांच्याच छताखाली जाऊन जर एवढ्या मोठ्या नेत्यांनी बैठका घेतल्या, तर नक्कीच त्यांची विश्वासार्हता कमी होते,” असा थेट हल्ला राऊत यांनी चढवला. “आम्ही त्यांच्या जागी असतो, तर अजितदादांच्या दालनात जाऊन नक्कीच बैठक घेतली नसती. पवारांनी काय करावे, हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा प्रश्न असला, तरी एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन बैठक घेणे, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे,” अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्यांनी उपचार घ्यावेत संजय राऊतांच्या या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. राजकीय संस्कृतीची आठवण करून देत शिंदेंनी राऊतांना सणसणीत टोला लगावला. “शरद पवार साहेब हे राज्याचे अत्यंत मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या दालनात आले, त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो. हीच महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती आहे आणि ती आम्ही जपत आहोत. आता यामुळे जर कोणाच्या पोटात दुखत असेल किंवा कोणाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, तर त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत; त्यांनी तिथे जाऊन नक्की उपचार घ्यावेत,” असा पटलवार एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. यासोबतच राऊतांची टीका म्हणजे निव्वळ ‘क्षुद्रपणा’ असून अशा लोकांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आले तरी स्वागत करू – प्रताप सरनाईक या संपूर्ण वादात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी राऊतांच्या टीकेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच काही सूचक राजकीय विधानेही केली. “संजय राऊत काय बोलतात याला फार महत्त्व देऊ नका. राजकारणात कोणीही कोणाचे कायमस्वरूपी शत्रू नसते. उद्या जर उद्धव ठाकरे आमच्याकडे आले, तरी आम्ही खुल्या मनाने त्यांचे स्वागतच करू,” असे सरनाईक म्हणाले. जयंत पाटलांना खुली ऑफर सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा दाखला देत प्रताप सरनाईक म्हणाले, “तटकरे गेल्यानंतर मी जयंत पाटील यांना म्हटले की, तुमची शिवसेनेशी जवळीक जास्त आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठीही आमच्याकडे जागा करू शकतो. थोडक्यात काय, तर राजकारणात कधीही काहीही होऊ शकते.”
Source link
ज्यांच्या पोटात दुखतंय, त्यांनी 'आपला दवाखान्या'त जावं:शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा प्रत्युत्तर