![]()
महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा ‘उद्यान पंडित पुरस्कार २०२४’ मोर्शी येथील प्रगतिशील संत्रा बागायतदार नवीनकुमार अरुणकुमार पेठे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे बुधवार १ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, इंद्रनील नाईक तसेच मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आ.चंदू यावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संत्रा बागायतीतील आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित शेती, शाश्वत कृषी पद्धती, निर्यातक्षम उत्पादन आणि शेतकरी मार्गदर्शनातील भरीव योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने पेठे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. नागपुरी संत्रा उत्पादनात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पेठे यांनी स्वयंचलित ठिबक सिंचन, पाणी बचत तंत्रज्ञान, सेंद्रिय खतांचा वापर, जैविक निविष्ठा, कंपोस्ट आणि ट्रायकोडर्मा यांचा समतोल वापर करून शाश्वत शेतीला चालना दिली आहे. तसेच उत्पादनापासून विपणनापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी उभारून संत्रा उत्पादकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.पेठे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे मोर्शी तालुका आणि अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशामुळे संत्रा उत्पादक शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
Source link
नवीनकुमार पेठे यांना उद्यान पंडित पुरस्कार:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक सन्मान