![]()
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा अनुभव आहे. जमिनीवर पडलेल्या या खांबांमुळे शेतात आंतरमशागत, पेरणी आणि इतर शेतीकामे करणे अडचणीचे झाले आहे. या पडलेल्या खांबांमुळे भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वानखडे यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन पडलेले वीज खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जर काही अनुचित घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशाराही अर्जदाराने दिला आहे.
Source link
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती