Headlines

नागपुरात 10 हजार टनी अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रकल्पाचे भूमिपूजन:लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, युद्धनौकांसाठी उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम घटकांची गरज पूर्ण होईल




नागपूरच्या अंबाझरी येथील ‘यंत्र इंडिया लिमिटेड’मध्ये शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १०,००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक ‘अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस’ प्रकल्पाची पायाभरणी झाली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन आणण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, हा नवीन अॅल्युमिनियम प्रकल्प स्वदेशीकरणाच्या मोहिमेला अधिक बळ देईल. यामुळे भारताचा परदेशी आयातीवरील खर्च पूर्णपणे वाचेल आणि देशाच्या एरोस्पेस तसेच लष्करी गरजा पूर्ण करणारा हा प्रकल्प राष्ट्रीय उपलब्धी ठरेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशाच्या लष्करी सज्जतेला आणि औद्योगिक क्षेत्राला मोठे फायदे होणार आहेत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांची बाह्य रचना, युद्धनौका आणि लष्कराची बख्तरबंद वाहने तयार करण्यासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम घटकांची गरज या प्रकल्पातून पूर्ण केली जाईल. आतापर्यंत अशा विशिष्ट घटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात करावी लागत असे. राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पामुळे भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात १५.६ टक्क्यांची वाढ झाली असून, २०१३-१४ च्या तुलनेत हे उत्पादन जवळपास चौपट वाढले आहे. देशांतर्गत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा यात मोठा वाटा असून, खाजगी क्षेत्राचे योगदान विक्रमी ४२,००० कोटींवर गेले आहे. संरक्षण उत्पादन वाढल्यामुळे भारताने संरक्षण साहित्याच्या निर्यातीतही ३८,४२४ कोटींचा टप्पा गाठला आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक निर्यातदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करत असल्याने जग भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगतीची दखल घेत आहे. फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे वर्णन नव्या भारताच्या तांत्रिक सामर्थ्याचे आणि अद्वितीय क्षमतेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *