![]()
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. .केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलांतर्गत दिल्ली उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आता कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची धुरा सांभाळतील. मराठा आरक्षण सुनावणीसाठी नव्याने पूर्णपीठ स्थापन होणार न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याबाबत गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. आता न्यायमूर्ती घुगे यांची पदोन्नतीने बदली झाल्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागणार आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांसह आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, सध्या राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा अंतिम युक्तिवाद सुरू होता. नव्या पूर्णपीठाच्या स्थापनेनंतर या महत्त्वपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी कशी पुढे सरकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वृत्त वाचा
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 9 वा दिवस:जरांगे पाटील-सरकारमधील कोंडी कायम, उपचार घेणार नसल्याची भूमिका
मराठा-कुणबी 58 लाख नोंदी, जात प्रमाणपत्र तसेच इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथे 11 वे उपोषण 29 ऑगस्टला सुरू केले. आज त्यांच्या आंदोलनाचा 9 वा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारास नकार दिला आहे. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला त्यांनी दोन वेळेस माघारी पाठवले. आठव्या दिवशीही म्हणजे शनिवारी जरांगे पाटील आणि सरकारमधील कोंडी कायम होती. दोन दिवसांपूर्वी जरांगेंची मंत्री विखे पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी पाणी प्यायले आणि सलाइन लावण्याचेही मान्य केले. त्यानुसार त्यांना सलाइन लावण्यात आले होते. वाचा सविस्तर
Source link