मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे (ता.वसमत)गावात होता. या गावात गेल्या ७ वर्षांत भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. तसेच वारंवार भूगर्भातून आवाज येण्याचे प्रकार घडतात. जुलै २०२४ मध्ये आपत्ती व्यवस्थापन
.
हिंगोली जिल्ह्यात १० जुलै २०२४ रोजी झालेल्या भूकंपानंतर हा मुद्दा विधानसभेत गाजला होता. यासंदर्भात भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली असून अद्याप या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हाधिकारी गुप्ता
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची तिव्रता जाणवली आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय रविवारी मी पांगरा शिंदे व परिसरातील गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची माहिती तातडीने प्रशासनाला कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
भूकंपाचे केंद्र असलेली जागा
शनिवारी सकाळी शाळांमध्ये मूल्यमापन चाचण्या सुरू होत्या. मात्र भूकंपानंतर घाबरलेल्या शाळा प्रशासनाने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर मोकळ्या जागेत बसवून चाचण्या घेतल्या. झाडांखाली वर्ग भरवण्यात आले होते.
भूकंपादरम्यान या उपाययोजना करा
घरात असताना मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपऱ्याजवळ आसरा घ्यावा. डोक्याचे संरक्षण करावे. भूकंपाचे धक्के थांबल्यानंतर मोकळ्या जागेत जावे. लिफ्ट, जिन्याचा वापर करू नये, वीजखांब, वीजतारांजवळ जाऊ नये. गॅस आणि विजेचे स्वीच तात्काळ बंद करावेत.
पांगरा शिंदेत शेतकरी, मजुरांची वस्ती
पांगरा शिंदे गाव शेतकरी आणि शेतमजुरांची वस्ती आहे. वारंवार होणारे भूकंप आणि भूगर्भातून येणारे आवाज यांची आता ग्रामस्थांना जणू सवय झाली आहे. गावाचा परिसर बागायती असल्याने बारमाही पिके घेणारे शेतकरी गावात आहेत. त्यामुळे रोजगारासाठी गावातून होणारे स्थलांतर कमी आहे. गावात सर्व जातीधर्माचे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे पांगरा शिंदे गाव प्रकाशझोतात आले आहे.
२५ वेळा निवेदन देऊनही दखल नाही
पांगरा शिंदे भागात सतत भूकंप होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वेक्षण करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, गावकऱ्यांमध्ये जनजागृती करावी यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शासनाकडे २५ वेळा निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. भूकंप झाल्यानंतर लोकप्रतिनिधी येतात अन् निघून जातात, काहीही होत नाही. २०१७ पासून अर्ज दिले आता कंटाळून अर्ज देणेही सोडले. -भागवत शिंदे, माजी उपसरपंच