![]()
हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. २० दुपारी उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर दांम्पत्याचा खून झाला असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथे बळीराम देवबा वाघमारे (६५) त्यांची पत्नी कलावतीबाई वाघमारे (६०) यांना पारडा शिवारात सुमारे १२ एकर शेती आहे. त्यांना एक मुलगा, सुन व नातू असा परिवार आहे. बळीराम व कलावतीबाई हे दांम्पत्य शेतातील आखाड्यावर राहतात. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास त्यांचा नातू शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी बळीराम व कलावतीबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्याने तातडीने सदर प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती बासंबा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेेचे निरीक्षक मोहन भोसले, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सदर मृतदेह काळे पडलेल्या स्थितीत आढळून आले. तर मयत दांम्पत्यांच्या डोक्यावर व गळ्यावर जखमा आढळून आल्या. त्यामुळे त्यांचा खून झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथक घटनास्थळाच्या परिसरात घुटमळले. तर बळीराम व कलावतीबाई यांचा मृत्यू ता. १८ जून रोजी झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलविले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुर्तास पोलिसांनी काही जणांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे पारडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. शेतीच्या वादातून खून झाल्याची चर्चा पारडा परिसरात वाघमारे दांम्पत्याचा शेतीच्या वादातून खून झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. घटनास्थळावर कुठलेही हत्यार किंवा इतर वस्तू सापडली नसल्याची चर्चा सुरु आहे. वन विभागाच्या पथकाचीही भेट घटनास्थळावर मयत वाघमारे दांम्पत्याचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला काय याची शाहनिशा करण्यासाठी पोलिसांनी वन विभागाच्या पथकालाही माहिती दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र सदर प्रकार वन्य प्राण्याच्या हल्याच्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृ्त्यू:खूनाचा संशय, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी