![]()
मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विमाधारक व उर्वरित विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट विमा द्यावा. विमा कंपनीने २५ एप्रिल २०२५ रोजी खरिपाचा विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला नाही तर महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रखरखत्या उन्हात तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकरी ठिय्या आंदोलन करणार आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार आहे. शासनाने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार, अशी माहिती प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. पीकविम्याचे पैसे खात्यात जमा होईपर्यंत तालुक्यातील सर्व शेतकरी मुलाबाळांसह ठिय्या आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खरीप २०२५ चा पीकविमा हेक्टरी १७,५०० रुपयांप्रमाणे जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करत पीकविम्याची रक्कम खात्यात जमा करावी. निवेदन देताना प्रगती शेतकरी मंडळ तालुकाध्यक्ष राजू वानखडे, नंदकिशोर बबानिया, सुरेश तिवारे, हरीभाऊ वानखडे,अनिल देवगीरकर, जगदीश जोगळे, प्रफुल्ल मालधुरे, इरफान खान, गोपाल खंडारे, रमेश गोपकर, मनिष मुंदडा, विष्णुपंत चुडे, महेंद्र ठाकरे, अजय हांडे, संदीप ठाकरे, अनंत शेटे, गजानन गाडवे, रितेश लाहे, गोपाल मानकर, हरिनाम सिंह बाजहिरे, गिरधारी जाधव, मोहन मानकर, मुन्ना नाईकनवरे आदींची उपस्थिती होती. प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Source link
पीकविमा न मिळाल्यास 1 मे रोजी आंदोलन:उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रगती शेतकरी मंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन