Headlines

पूरग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय!:पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी; राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था




आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हजारो वारकरी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेत शहरातील महापालिकेच्या 101 शाळा वारकऱ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आजपासून थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदी आणि देहू परिसरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वारकऱ्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी पुणे महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. 101 शाळांमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी पुणे महापालिकेच्या 101 शाळांचे तात्पुरत्या निवारा केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या राहण्याबरोबरच जेवण, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये आणि वारकऱ्यांच्या निवासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे काय म्हणाल्या? महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, आळंदीतील पूरस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना आळंदीमध्ये न जाता पुण्यात सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पुणे महापालिकेने 101 शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. त्यांनी सांगितले की, आजपासून रविवारपर्यंत या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. पाणी कपातही रद्द महापौरांनी सांगितले की, शहरासाठी लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. रविवारपर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा केला जाणार असून त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. जर्मन हँगर्स, स्वच्छतागृहे आणि वाहतूक व्यवस्थाही सज्ज वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करून शहरात तीन ठिकाणी मोठे जर्मन हँगर्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. पुणे पोलिस आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून शहरातील वाहतूक सुरळीत राहील, यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे प्रशासन सतर्क इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी आणि देहू परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास प्राधान्य दिले असून, पुणे महापालिकेच्या शाळा तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने नागरिकांनाही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *