Headlines

पैठण येथे रात्री मुक्कामी येणाऱ्या महिला भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर:मंदिरासमोरील पोलिस चौकीला वर्षभर कुलूप, कर्मचारी फक्त सेल्फीपुरतेच




सध्या पवित्र अधिकमास सुरू असल्याने ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तीर्थक्षेत्रात दररोज हजारो महिला व पुरुष वारकरी भाविक दाखल होत आहेत. मात्र, प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे या भाविकांची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचे चित्र आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात हजारो गोरगरीब भाविक रात्रीच्या मुक्कामासाठी थांबतात, परंतु येथे सुरक्षेचा कोणताही धाक नसल्याने चोर, भामटे आणि दारुड्यांनी धुमाकूळ घातला असून महिला भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या वाढत असलेली उन्हाची प्रचंड तीव्रता आणि उष्णता लक्षात घेता, वयोवृद्ध व महिला वारकरी भाविक रात्रीच्या वेळी नाथ समाधी मंदिरासमोरील मंडप आणि परिसरातील उघड्या जागेत मुक्कामी थांबत आहेत. रात्री मुक्काम करून पहाटे गंगास्नान व नाथ समाधीचे दर्शन घेऊन दुपारपर्यंत घरी परतणे, असे नियोजन भाविक करत आहेत. मात्र, याच रात्रीच्या वेळी भाविकांच्या पदरी केवळ भीती आणि असुरक्षितता पडत आहे. परिसरातील नागरिकांच्या मते, ही चौकी फक्त लाइट चालू-बंद करण्यासाठी वॉचमन उघडतो. पोलिस प्रशासनाचे कर्मचारी कधीतरी या भागात येतात, तेही केवळ चौकीसमोर सेल्फी काढण्यापुरतेच. त्यानंतर या चौकीला कायमस्वरूपी कुलूप ठोकलेले पाहायला मिळते. सध्या अधिक मासामुळे दिवस-रात्र महिला भाविकांची गर्दी असते. जागेअभावी अनेक महिला मंदिराच्या तिन्ही बाजूंना उघड्यावर झोपतात. अशा वेळी दारुडे आणि भामटे या ठिकाणी येऊन महिलांची छेड काढतात. महिलांच्या पिशव्या, मोबाइल आणि गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पोलिस चौकी फक्त नावालाच; कायम कुलूप नाथ मंदिर संस्थानने भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी सर्व सुविधायुक्त पोलिस चौकीची व्यवस्था करून दिली आहे. मात्र, या चौकीला नाथषष्ठी सोहळ्यानंतर कधीच पोलिस कर्मचारी लाभले नाहीत. अधिक मासामुळे गर्दी वाढली Ãपोलिस प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली आहे. सर्व सुविधायुक्त चौकीची व्यवस्था संस्थानने करून दिली आहे. तरीही या चौकीला कायम कुलूप असते. सध्याची परिस्थिती पाहता ही पोलिस चौकी रात्रंदिवस चालू असणे अत्यंत गरजेचे आहे. -दादा बारे, कार्यकारी विश्वस्त, नाथ संस्थान, पैठण.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *