![]()
एकीकडे परिक्षांतील गैरप्रकारांवरून केंद्र सरकारवर विद्यार्थी, युवक व विरोधक तुटून पडलेले असताना आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या शिक्षणासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची आकडेवारीच महायुती सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६ टक्के निधी येतो असे भुसे यांनी निदर्शनास आणले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे यावेळी प्रमुख मार्गदर्शन झाले. केंद्रपुरस्कृत योजनांच्या आढाव्यासाठी आयोजित राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मांडलेली आकडेवारी अशी, २०२५-२६ मध्ये देशाचा एकूण ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्प ८७,३६७ कोटी रुपये होता. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला २,६७३ कोटी रुपये आले आहेत. राज्यात एक लाखांहून अधिक शाळा, ७.५ लाखांहून अधिक शिक्षक आणि २.१० कोटींहून अधिक विद्यार्थी असून, मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांपासून गडचिरोली-नंदुरबारसारख्या दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत पसरलेल्या या अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा विचार निधी वाटपात व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवचरित्र अभ्यासक्रमातील समावेशाबद्दल आभार छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्याच्या केंद्र सरकार व एनसीईआरटीच्या निर्णयाबद्दल मंत्री भुसे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.
Source link
महाराष्ट्रात 8.61 टक्के विद्यार्थी शिकतात- भुसे:केंद्र सरकारकडून फक्त 3.06 टक्के निधी मिळताे