![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी आणि राडा पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले आणि त्यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली. “एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कळवा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीत हकालपट्टीच्या मुद्द्यावरून ठिणगी पडली. अवघ्या दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. ‘मातोश्री’वरील या बैठकीत याच हकालपट्टीचा मुद्दा ऐरणीवर आला. जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त होऊ पाहणारे पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत मतभेद या बैठकीत उघडपणे बाहेर आले, ज्याचे रूपांतर तीव्र शाब्दिक बाचाबाचीत झाले. ठाकरेंचा संताप; अभिजित दिपकेंचे दिले उदाहरण बैठकीत सुरू असलेली शाब्दिक बाचाबाची आणि आपापसातील कलह पाहून उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत पदाधिकाऱ्यांना सुनावले. “सध्या देशात काय परिस्थिती आहे हे पहा. अभिजित दिपकेसारखा एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहे, त्यांना धारेवर धरत आहे; आणि तुम्ही लोक इथे क्षुल्लक पदांसाठी आपापसात कसली भांडणे करत बसला आहात?” अशा सडेतोड शब्दांत ठाकरेंनी या नेत्यांना झापले. दिग्गजांच्या उपस्थितीत उडाला गोंधळ विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घडला. या बैठकीला आमदार मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि माजी आमदार विलास पोतनीस यांसारखे प्रमुख नेते हजर होते. सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीतही ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच अशी गटबाजी उफाळून आल्याने पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या या राड्यानंतर आता ठाणे आणि कल्याणमधील ही अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे नेमके काय कठोर पावले उचलणार? हे पाहावे लागणार आहे. हे ही वाचा… जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे:ओबीसींच्या हक्कासाठी सरकारला झुकविल्याशिवाय थांबणार नाही, विजय वडेट्टीवारांचा एल्गार सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ची आज भंडारा येथून उत्साहात सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांवर भाष्य करत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा… नागपुरात नितीन गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:बॅरिकेडिंगवर चढत घोषणाबाजी, अनेक कार्यकर्ते ताब्यात केंद्र सरकारच्या ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला व अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सविस्तर वाचा…
Source link
'मातोश्री'वरील बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी:एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय?; उद्धव ठाकरेंनी झापले