![]()
इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने सोसायटीच्या आवारातील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तो वाद शांत झाला खरा, तोच आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारच अर्ज करू शकतात’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील नोकरीच्या संधींमधून मराठी तरुणांना डावलले जात असल्याचा आरोप आता केला जात आहे. अहमदाबादस्थित एका नामांकित रिक्रूटमेंट एजन्सीकडून ‘नोकरी डॉट कॉम’ आणि ‘लिंक्डइन’ या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर ‘EGM’ आणि ‘अकाउंट्स-फायनान्स’ या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या नोकरीसाठी वार्षिक २० ते २५ लाख रुपयांचे आकर्षक वेतन दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही नोकरी मुंबईतच असणार आहे. मात्र, पात्रतेच्या अटींमध्ये विशिष्ट भाषिक समाजाचा उल्लेख करून ‘फक्त गुजराती आणि मारवाडी’ उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याने “मुंबईकर मराठी तरुणांनी रोजगार मिळवण्यासाठी जायचे कुठे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कारवाईची मागणी जोर धरू लागली एजन्सीने जरी भाषेच्या गरजेचा दाखला दिला असला, तरी मुंबईत राहून मराठी उमेदवारांना अशा प्रकारे थेट नाकारल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर या जाहिरातीचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले असून, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित खाजगी कंपनी आणि अहमदाबादच्या त्या भरती एजन्सीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता नेटकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. मराठी एकीकरण समितीचा संताप दरम्यान, या जाहिरातीवरून मराठी एकीकरण समितीने संताप व्यक्त केला आहे. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख म्हणाले, “नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइन या नोकरी शोधक संकेत स्थळावरती एक जाहिरात पाहिली. खरंतर ही जाहिरात आहे एजीएम आणि अकाऊंट, फायनान्सशी संबंधीत. त्यांना एक सीए हवा आहे. एक अहमदाबाद एजंसी आहे तिने ही जाहिरात टाकली आहे. 5 जून रोजी ही जाहिरात टाकण्यात आली आहे. नोकरी आहे मुंबईमध्ये आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख रुपये आहे. त्यांना ही नोकरी मराठी माणसाला नाही द्यायचे. जाहिरातीवर काय लिहिले आहे “Only Gujarati and Marwari.” मराठी माणसाने कुठे जायचे? यावर शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही? दरवेळी आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का?” वाद वाढताच भरती एजन्सीकडून स्पष्टीकरण या प्रकरणावर चौफेर टीका झाल्यानंतर अहमदाबादच्या संबंधित भरती एजन्सीने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “आमची कंपनी केवळ एक प्लेसमेंट देणारी एजन्सी आहे. वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट पदांवर भरती करायची असते. जर एखाद्या कंपनीला एखाद्या विशिष्ट कामासाठी ठराविक भाषेचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असेल, तर त्यानुसारच आम्ही जाहिरात देतो. आमच्याकडे येणाऱ्या कंपन्यांमध्ये कोणत्याही एका जातीचे किंवा भाषेचे लोक नसून, देशाच्या विविध भागांतील लोक काम करतात. त्यामुळे या जाहिरातीचा चुकीचा किंवा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. केवळ पदाची आणि भाषेची गरज पाहूनच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.” वादाची मालिका सुरूच! काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने त्याच्या सोसायटीच्या आवारात जैन साध्वींसाठी पांढरी पट्टी आखण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाल्यानंतर अखेर ती पांढरी पट्टी रंगवून तो वाद शांत करण्यात आला होता. मात्र, तो वाद निवळत नाही तोच आता थेट रोजगाराच्या बाबतीत मराठी-गुजराती-मारवाडी असा भाषिक भेदभाव समोर आल्याने मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source link
मुंबईतील नोकरीसाठी मराठी उमेदवारांना 'नो एन्ट्री'?:फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, वादग्रस्त जाहिरात व्हायरल