.

येथे सुरू असलेल्या अक्षर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज व्यक्तिचित्र रांगोळी (पोट्रेट रांगोळी) आणि सुलेखन (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकांचे थक्क करणारे सादरीकरण करण्यात आले. कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांपेक्षाही अधिक जिवंत, भावस्पर्शी आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव रांगोळीच्या माध्यमातून साकारताना पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते.
या संमेलनात राज्यभरातून आलेले नामवंत कलाकार आपली कला सादर करत आहेत. यामध्ये मुंबईचे विलास राहते व मिताली सुर्वे, नाशिकच्या कल्याणी बागुल, सिंधुदुर्गचे केदार टेमकर, पुण्याच्या शारदा अवसरे, पालघरची श्रावणी पाटील आणि कर्नाटकातील भारत नांद्रे या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिचित्र रांगोळ्या उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. संमेलनास जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती चेतन केदार, पंढरपूरचे सभापती डॉ. शुभम आगावणे, महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय इंगळे आदींनी भेट दिली. पुण्याच्या कलाकार शारदा अवसरे या पेशाने वकील असून त्यांनी साकारलेली रांगोळी या संमेलनातील सर्वात मोठे आश्चर्य ठरली. त्यांनी संत तुकाराम महाराजांचे अत्यंत सुंदर रेखाटन केले आहे. विशेष म्हणजे, ही रांगोळी उलट्या बाजूने पाहिल्यास ”पायथागोरस”च्या सिद्धांतानुसार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे रूप धारण करते. हा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. रांगोळीसोबतच अक्षरांना सुंदर रूप देणाऱ्या ”सुलेखन” (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकावर विशेष चर्चा व सादरीकरण पार पडले. यामध्ये मुंबईचे श्रीकांत गवंडे व हेमंत घरत, जळगावचे सूर्यकांत वाघमारे आणि सांगलीचे श्रीराम मोहिते यांनी आपल्या लेखणीची जादू दाखवली. यानंतर ”कलेचा प्रवास: लोकल ते ग्लोबल” या विषयावर विशेष मुलाखत रंगली. मुंबईचे डॉ. तेजस लोखंडे यांनी मुलाखती घेतल्या. या चर्चासत्रात मिताली सुर्वे , अमित भोरकडे आदींचा सहभाग होता.
” पायथागोरस’ रांगोळीने वेधून घेतले लक्ष