Headlines

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ:सातारा, जळगाव, बारामतीसह परभणीला वादळाचा तडाखा; शेती पिकांचे नुकसान




राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती क्षेत्राला, विशेषतः फळबागांना बसला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान केले आहे. सातारा जिल्ह्यात दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. वाई तालुक्यातील भुईंज आणि जोशीविहीर परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे एक कार पाण्यात अडकली होती, जिला स्थानिक नागरिकांनी जीप आणि पिकअपच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकतीच लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या ‘मदर प्लांट’सह टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवथर परिसरात सुसाट वाऱ्यामुळे विजेचा खांब कोसळल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याचे पत्रे उडाले जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याचे लोखंडी अँगल आणि पत्रे वादळामुळे उडून खाली कोसळले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून टोल नाक्यावरील दोन लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. बारामतीत केळीच्या बागा जमीनदोस्त; सुनेत्रा पवारांकडून पाहणी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे जाऊन नुकसानग्रस्त केळीच्या बागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सरकारकडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी बोलताना, “राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू असून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अधिकृत नाव समोर येईल,” अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली. परभणीत चक्रीवादळ सदृश स्थिती; अनेक मार्ग बंद परभणी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी आलेल्या तीव्र सोसाट्याच्या वाऱ्याने मोठी दाणादाण उडवून दिली. पूर्णा तालुक्यातील ‘पूर्णा झिरो फाटा’ मार्गावर महाकाय झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने युद्धपातळीवर ही झाडे हटवण्याचे काम सुरू केले. माटेगाव ते लक्ष्मणनगर पाटी या मार्गावर चक्रीवादळासारखे तीव्र वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, ज्यामुळे हा मार्गही काही काळासाठी बंद करावा लागला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीचे अंदाज घेण्याचे काम सुरू असून, स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *