![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचे फोटो नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “महापुरुषांचे फोटो गायब आहेत, त्यामुळे हा पक्ष भाजपच्या अधिक जवळ गेला असल्याचे दिसते,” अशी टीका त्यांनी केली. बॅनरबाजीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. सभागृहाच्या आत महापुरुषांच्या प्रतिमा आणि विचारांना योग्य स्थान देण्यात आले असून पक्षाच्या स्थापनेपासूनची माहितीही प्रदर्शित करण्यात आली आहे. रोहित पवार जाणीवपूर्वक टीका करत असल्याचा आरोप पक्षातील काही नेत्यांनी केला. वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट होणार असून, बॅनर वादामुळे राष्ट्रवादीतील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाकडून वर्धापन दिन साजरा दरम्यान, काल वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमात शरद पवार यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तुलनेवर स्पष्ट भूमिका मांडली. “मोदी किती वर्षे पंतप्रधान राहिले हा वेगळा विषय आहे, मात्र नेहरूंच्या कर्तृत्वाशी आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही,” असे पवार म्हणाले. त्यांनी नेहरू, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या देशासाठीच्या योगदानाचा उल्लेख केला. स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचा संघर्ष, तुरुंगवास आणि देशनिर्मितीतील भूमिका अधोरेखित करत इतिहास विसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच इंदिरा गांधींवरील टीकेलाही प्रत्युत्तर देत, देशाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे पवारांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांची वर्धापनदिनी भावुक पोस्ट… सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत दादांच्या स्मृतींना अभिवादन केले. “आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही पोकळी प्रत्येक क्षणी जाणवते. मात्र त्यांनी जपलेला माणुसकीचा वारसा, विकासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत अधिक सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.
Source link
राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाला वादाची किनार:बॅनरवर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचा रोहित पवारांचा आरोप