![]()
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची झालेली चाळण, साचलेला चिखल आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या लाडसावंगी येथील व्यापारी मंडळाने गुरूवारी रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन केले. शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर या मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात व चिखलात व्यापाऱ्यांनी एकत्र येत बेशरमाची झाडे लावून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनात जितू पडुळ, अजय गाडेकर, अर्जुन शेळके, प्रभू कोंडके, शायनाथ राऊत, जितेंद्र पडुळ, गणेश राऊत, मनोज संभेराव, साहिल जैन, विकी जैन, संदीप ढोके, राजू दहिभाते, नामदेव पवार यांच्यासह परिसरातील सर्वच व्यापारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेतेमंडळींनी केवळ मते मागण्यापुरते गावात यावे, विकासाच्या नावावर मात्र नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक व्यापाऱ्यांनी दिली. रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य तात्काळ दूर करून रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही, तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील व्यापारी मंडळाने दिला आहे. निवडणूक आली की आश्वासने, नंतर दुर्लक्ष लाडसावंगी येथील शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर या मुख्य रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच हा रस्ता चिखलमय झाला आहे. येथील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, निवडणुका जवळ आल्या की सर्वच पक्षांचे नेते आश्वासने देतात. मात्र, निवडणूक संपताच दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडतो.
Source link
लाडसावंगी येथे रस्त्यावरील चिखलामुळे व्यापारी आक्रमक:निषेध करत रस्त्यात लावली बेशरमाची झाडे