![]()
फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला थकल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी बेलीफ, वकील आणि जमीन मालक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दुपारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे दालन बंद असल्याने बेलीफने पंचनामा करून प्रशासनाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुमारे तीन तास प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ सुरू होती. सायंकाळी ५.१५ वाजता जिल्हाधिकारी गौडा कार्यालयात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. हे प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे असून, शासन प्रतिनिधी म्हणून प्रशासनाला नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी शासनाकडे चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जमीनधारक श्यामलाल ताटू आणि ॲड. बारहाते यांनी सांगितले की, त्यांना गेल्या २० वर्षांपासून भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. जानेवारी २०२६ मध्ये चार महिन्यांत रक्कम देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले होते, परंतु मोबदला न मिळाल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Source link
वाकोद प्रकल्प भूसंपादन:जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश, 20 वर्षांपासून मोबदला थकल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई