![]()
दिवसभराचा असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानाने त्रस्त झालेल्या अहिल्यानगरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने दिलासा दिला. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच फटक्याने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. या पावसामुळे जमिनीला हवा असलेला ओलावा मिळाल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागला होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा चटका इतका तीव्र होता की तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा उकाड्यात मोठी वाढ झाली होती. याच उष्ण वातावरणातून निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, अधूनमधून हलक्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात कुठे, किती पाऊस? जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली असली तरी पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. जिल्ह्यात सरासरी १८.५ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात शुक्रवारी केवळ २.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी काही तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली: कर्जत महसूल मंडळामध्ये तब्बल ४२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोळेगाव येथे १५.५ मिमी तर चिंभळे येथे १०.८ मिमी पाऊस झाला आहे. वेळेअगोदर मान्सून पोहोचणार! ^”सध्या मान्सूनची आगेकूच सामान्य वेळेपेक्षा वेगाने होत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या भागात मान्सूनच्या आगमनासाठी हवामान परिस्थिती अत्यंत अनुकूल बनत आहे. वातावरणातील बदल आणि प्रणालीच्या निर्मितीमुळे मे महिन्याच्या अखेरीस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला गती देणारी एक महत्त्वाची प्रणाली सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होऊन मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होईल. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
Source link
वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी:असह्य उकाड्यानंतर गारवा, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता