![]()
चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार, ग्रामस्थ, पोलिस अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येथील बाजार मुख्य पटांगणात नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झा
.
वणीसह परिसरातील सुमारे २५ गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येतात. शेतकरी भाजीपाला व शेतीमाल घेऊन येतात. मात्र, बाजार पटांगणातील मोठा परिसर अद्याप कच्चा असल्याने संततधार पावसामुळे चिखल व दलदल निर्माण झाली आहे. विक्रेत्यांना चिखलात बसून भाजीपाला विकावा लागत असून, ग्राहकांनाही चिखलातून वाट काढत खरेदी करावी लागत आहे. असुविधेमुळे अनेक विक्रेते महामार्गाच्या कडेला बसत असल्याने वाहनांची व नागरिकांची गर्दी वाढत आहे. भरधाव वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, बाजाराच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवत आहे. यासह बाजार पटांगणात पिण्याचे पाणी, महिलांसाठी प्रसाधनगृह, पाण्याचा निचरा, नियमित स्वच्छता आणि कचरा संकलन यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाचे साचलेले पाणी, चिखल व अस्वच्छतेमुळे दुर्गंधी वाढत असून, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा धोका असताना आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आठवडे बाजाराचा वार्षिक लिलाव सुमारे २९ लाख रुपयांना झाल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या उत्पन्नाच्या तुलनेत मूलभूत सुविधा का नाहीत, असा सवाल नागरिक करत आहेत.
बाजार परिसरातील स्वच्छता, कचरा आणि पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाची प्रत्यक्षस्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. बाजार पावती वसुलीबाबतच्या तक्रारींची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल . – संजय देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी, वणी
चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन बाजार मुख्य पटांगणात भरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थितीत बदल झालेला नाही. पावसामुळे विक्रेते पुन्हा महामार्गाच्या कडेला बसू लागले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारी बाजाराच्या दिवशी आंदोलन करून ग्रामपंचायत प्रशासन तसेच वणी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात येईल .- राकेश थोरात, सदस्य, वणी ग्रामपंचायत