![]()
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी दिवसातून केवळ दोनदा आहार घेणे, नियमित व्यायाम व शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारणे गरजेचे असल्याचा सल्ला जीवनशैलीतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. मोहाडी येथे आयोजित श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेत ‘जीवनशैली’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी होते. व्यासपीठावर सह्याद्री ॲग्रो फार्मचे विलास शिंदे, निफाड तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे, तुळशीराम गावित, प्रा. विलास देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. दीक्षित यांनी सांगितले की. भूक लागल्यावरच जेवा, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे स्नॅक्स, रात्रीचे जेवण अशी वारंवार खाण्याची सवय सोडून द्या. वारंवार खाण्याने शरीरात इन्सुलिनची पातळी सतत वाढलेली राहते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया थांबून लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करायचे किंवा मधुमेह असल्यास भात, पोळी, गोड पदार्थ कमी करून डाळी, पनीर, मोड आलेली कडधान्ये खाण्याचा सल्ला त्यांनी दिला. दररोज ४५ मिनिटे नियमित ५ किमी वेगाने चालण्याचा व्यायाम करावा. आहाराच्या वेळा, वजन नियंत्रण, सकस आहार आणि नियमित व्यायामाचे आरोग्यदायी महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचलन धनंजय वानले यांनी केले, तर प्रा. धनंजय देशमुख यांनी आभार मानले.
Source link
निरोगी आरोग्यासाठी दिवसातून दोनदाच आहार घेणे आवश्यक:मोहाडीत ‘जीवनशैली’वर डॉ. दीक्षितांचा सल्ला