![]()
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि रायगड-रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षामध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांनी हालचाली वाढवल्या असून नेतृत्वाच्या भेटीगाठींना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या अंतर्गत लॉबिंगचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, रमेश अप्पा थोरात, विलास लांडे आणि नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत. प्रत्येक इच्छुकाने पक्षश्रेष्ठींकडे आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेता ही जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इच्छुक नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली असून, आपल्यालाच संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे रायगड-रत्नागिरी मतदारसंघातही उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे आणि अजित यशवंतराव ही नावे सध्या चर्चेत आहेत. आज सकाळीच राजीव साबळे आणि अजित यशवंतराव यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. या भेटीत विधानपरिषद उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील अंतिम निर्णय अजून स्पष्ट नसला तरी इच्छुकांची मोर्चेबांधणी पाहता राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून मोठी चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनेत्रा पवार यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे विधानपरिषद जागेवरून महायुतीतच रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर मजबूत दावा केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे 344 प्रतिनिधी आहेत, तर भाजपकडे 306 सदस्य आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 68 सदस्य, काँग्रेसकडे 19, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे 17 आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. या आकडेवारीमुळे राष्ट्रवादीने आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजपदेखील ही जागा सहज सोडण्याच्या तयारीत नसल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे आणि रायगड-रत्नागिरी या दोन्ही जागांवरून पक्षातील स्पर्धा तीव्र झाल्याने आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Source link
विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा