![]()
रायगडावर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी संभाजीराजे छत्रपती रायगडावर उपस्थित राहून शिवभक्तांना संबोधित करतात. यंदाही त्यांनी भावनिक शब्दांत संदेश देत शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन असल्याचे म्हटले. संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांच्या उत्साहाचे कौतुक केले. रायगडावर जमलेल्या जनसमुदायाचा उल्लेख करताना त्यांनी, हा केवळ जनसागर नाही, तर शिवसागर आहे, असे म्हटले. रायगडावर मर्यादित सुविधा असतानाही हजारो शिवभक्त अनेक दिवसांपासून मुक्काम करून या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात, याबद्दल त्यांनी विशेष गौरव केला. राहण्याची, जेवणाची आणि इतर सुविधांची कमतरता असूनही शिवभक्त मोठ्या श्रद्धेने रायगडावर येतात, हेच महाराजांविषयीचे प्रेम आणि निष्ठा दर्शवते, असे त्यांनी नमूद केले. रात्रीची व्यवस्था, दैनंदिन गरजा आणि अनेक अडचणी असूनही हजारो लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येथे दाखल झाल्याचे पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यास स्वतंत्र ओळख दिली राज्याभिषेक सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करताना संभाजीराजेंनी सांगितले की, हा दिवस केवळ एका राजाच्या राज्याभिषेकाचा नव्हता, तर स्वराज्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ होता. ज्या ठिकाणी आज मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच ठिकाणी महाराजांना छत्रपती पदाचा मान मिळाला होता. अनेक सत्ताधीशांना आणि गुलामगिरीच्या जोखडाला आव्हान देत महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे हा दिवस इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी नव्या शतकाची सुरुवात केली आणि स्वराज्याला स्वतंत्र ओळख दिली, याची आठवण त्यांनी करून दिली. इतिहास आणि त्यामागील प्रेरणा जपण्याचे केले आवाहन या वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी एक महत्त्वपूर्ण विधान करत शिवराज्याभिषेक दिनाला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हटले. देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले, तो दिवस निश्चितच ऐतिहासिक होता. मात्र त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांविरोधात लढा देत स्वराज्य उभे केले आणि जनतेला स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. विविध सत्तांच्या जोखडातून समाजाला मुक्त करून स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कोणता असेल, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवसच आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित शिवभक्तांना स्वराज्याचा इतिहास आणि त्यामागील प्रेरणा जपण्याचे आवाहन केले.
Source link
शिवराज्याभिषेक हाच भारताचापहिला स्वातंत्र्य दिन- संभाजीराजे:लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त किल्ले रायगडावर