![]()
राज्यात पुरेशा पावसाअभावी खरीप पिके वाया गेल्याने बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश न केल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकांची अवस्था पाहा, असा संताप व्यक्त करत त्यांनी बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत न दिल्यास सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा थेट इशाराही तुपकरांनी सरकारला दिला आहे. राज्य सरकारने राज्यातील 18 दुष्काळसदृश जिल्हयानची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश न केल्याने रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात 45 ते 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः होरपळ झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका तुपकर यांनी केली आहे. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचा निर्णय मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर घेतला जात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ 18 नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यांच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भगत पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या तसेच बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याला तातडीने दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करावे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत केली, रात्रंदिवस कष्ट केले. पाऊस नाही म्हणून पिक हातातून गेले. आता सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचे का? बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिले का? पुढे लोकप्रतिनिधींवर टीका करताना रविकांत तुपकर म्हणाले, लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिले आहे का? गल्लीत आणि मतदारसंघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. तसेच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेते आपले राजकीय मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेऊन एका पॅनलमध्ये एकत्र आले आणि निवडणूक लढले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे? असा सवालही तुपकर यांनी केला आहे.
Source link
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत:अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडेल, रविकांत तुपकर यांचा इशारा