![]()
धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरने ७ महिने उसाचे बिले थकवले. त्याने आर्थिक विवंचनेत आलेल्या मुस्ती येथील ५० वर्षीय रामचंद्र आप्पाशा कळके या शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी भेट घेतली. तिथे त्यांनी दीड लाख रुपये उसाचे बिल आणि अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण साडेसहा लाख रुपयांची मदत मृत शेतकऱ्यांच्या वारसांना दिली. शिवाय कारखान्यात त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. शेतकरी रामचंद्र कळके यांनी शेतातील ऊस दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर या साखर कारखान्याला गाळपासाठी दिला होता. मात्र, ऊस कारखान्यात जाऊन तब्बल ७ महिने उलटले तरी त्यांना त्यांच्या उसाचे बिल मिळाले नव्हते. शेतीसाठी काढलेले कर्ज, दैनंदिन खर्च आणि वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे कळके हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. हक्काचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. थकीत दीड लाख आणि कारखान्याच्या वतीने ५ लाख या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. या आत्महत्येला सर्वस्वी गोकुळ शुगर कारखाना आणि प्रशासनच जबाबदार आहे, असा थेट आरोप करत नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि मृताच्या नातेवाइकांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी उसाचे थकीत असलेले १ लाख ५० हजार रुपये आणि कारखान्याच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत अशी एकूण ६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम कुटुंबीयांना दिली. त्यानंतर हा वाद काहीसा शमला आहे.
Source link
संतापजनक:सोलापुरात शेतकऱ्याचा बळी गेल्यावर गोकुळ शुगरने दिले थकीत ऊस बिल, राज्य शासनकडूनही मदत मिळवून देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका