![]()
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मिरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून गेल्या काही दिवसांत वाद निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगत अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत धार्मिक भावना भडकवू नयेत, असा इशारा दिला आहे. पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी भारतीय संविधानाचा उल्लेख करत सर्व धर्मांना समान अधिकार असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही कृती संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नये. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाबाबत बोलताना, मुस्लीम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलेच लोक आहेत. भारतात पूर्वी सर्वजण हिंदू होते. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणारे वातावरण तयार होऊ देऊ नये, असे विधान केले. भाजपसह कोणत्याही पक्षाने समाजात द्वेष पसरवणारी भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. रामदास आठवले यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बकरी ईदच्या कुर्बानीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असताना, आठवलेंनी दिलेला हा सल्ला भाजपसाठी घरचा आहेर मानला जात आहे. भारतीय संविधान सर्वांसाठी समान आहे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असेही आठवले यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील वाढत्या धार्मिक वादांच्या पार्श्वभूमीवर आठवलेंच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, मिरारोड परिसरात काही दिवसांपूर्वी पूनम इस्टेट क्लस्टर परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही बकऱ्यांना निश्चित करण्यात आलेल्या जागी हलवण्याचा निर्णय घेतला. शिमीरा पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. परिसरातील वातावरण तणावपूर्ण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बकऱ्यांना टेम्पोमधून हलवण्यात आले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. विशेष सुरक्षा व्यवस्था बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर शहरात प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. मागील काही दिवसांत झालेल्या गदारोळानंतर पोलिसांनी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 525 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सौहार्द राखावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Source link
संविधानापेक्षा कोणी मोठं नाही, भावना भडकवू नका:रामदास आठवलेंनी भाजपलाच सुनावलं; बकरी ईदवरून राजकारण तापलं