![]()
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय (जीआर) फसवा असून, त्यातून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना हाके म्हणाले की, आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र, सरकारने काढलेला जीआर चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. या जीआरच्या आधारे दिलेल्या सुमारे 90 टक्के प्रमाणपत्रांना न्यायालयात आव्हान दिल्यास ती रद्द होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. सरकारमधील काही लोक मनोज जरांगे यांना पुढे करत असल्याचा दावा हाके यांनी केला. जरांगे यांनी राजकारण्यांच्या तालावर नाचण्याऐवजी स्वतंत्र भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अभिजित दिपके यांच्यावर टीका करताना हाके म्हणाले की, दिपके हे केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित आहेत. प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्याऐवजी त्यांनी अभ्यासपूर्ण आंदोलन करावे. ‘आम्हाला अभिजित दिपके यांची गरज नाही, आम्ही संविधान वाचवणारी माणसे आहोत,’ असेही हाके यांनी स्पष्ट केले. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याचे पाऊल योग्य असल्याचे सांगत हाके यांनी त्याचे स्वागत केले. ओबीसी समाजाची सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी पुन्हा केला. काँग्रेसला ओबीसी समाजाची मते हवी असतील, तर विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवरही हाके यांनी टीका केली. ‘मनोज जरांगे एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकले नाहीत, तरीही ‘याला पाडतो, त्याला पाडतो’ अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत. अशा भाषेचा लोकशाहीत स्वीकार होऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ‘मनोज जरांगे ज्योतिषी आहेत का?’ असा सवालही उपस्थित केला.
Source link
सरकारचा जीआर फसवा, ओबीसींची फसवणूक:लक्ष्मण हाके म्हणाले – न्यायालयात आव्हान दिल्यास 90 टक्के प्रमाणपत्रे रद्द होतील