![]()
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रवक्ते सौरव दास सध्या दोन दिवसीय बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सुमारे 15 ते 20 युट्युबर्स आणि मीडिया कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरात विनापरवानगी घुसखोरी करून आतले व्हिडिओ बनवले आणि ते प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांना कठोर कारवाईचे आवाहन केले आहे. तसेच, या घटनेचे पडसाद थेट संसदेतही उमटले आहेत. सौरव दास यांचा आरोप- ‘कुटुंबाच्या सुरक्षेला गंभीर धोका’ या घटनेनंतर सौरव दास यांनी ‘एक्स’ (X) या समाजमाध्यमावर पोस्ट करत दिल्ली पोलिसांकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “काही युट्युबर्स आणि मीडिया चॅनल्स माझ्या घरात घुसले आणि त्यांनी घरातील दृश्ये सार्वजनिक केली. हे केवळ माझ्या गोपनीयतेचे (Privacy) उल्लंघन नसून माझ्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेला निर्माण झालेला गंभीर धोका आहे.” तसेच, काही लोक आदल्या रात्रीपासूनच घराबाहेर तळ ठोकून होते आणि या व्हिडिओमुळे समाजकंटक आपल्या घराला लक्ष्य करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सीजेपीची पत्रकार परिषद: अभिजीत अय्यर-मित्रावर गंभीर आरोप या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे आशुतोष रांका आणि रत्ना सिंग यांनी छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानावरून पत्रकार परिषद घेतली. आशुतोष रांका यांनी थेट ‘अभिजीत अय्यर-मित्रा’ या व्यक्तीवर चिथावणी दिल्याचा आरोप केला. रांका म्हणाले, “अभिजीत अय्यर-मित्रा याने काही वेळापूर्वी एका पॉडकास्टमध्ये सौरव दासवर चुकीचे आरोप केले आणि घराची चुकीची माहिती दिली. याच माहितीच्या आधारे हे युट्युबर्स तिथे पोहोचले. दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या अभिजीतकडे पुरावे नसतील, तर त्याला आम्ही थेट कोर्टातच खेचू.” आंदोलन बिघडवणाऱ्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करा’ रत्ना सिंग यांनी 6 जूनच्या नीट आंदोलनातील एका घटनेची आठवण करून देत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “6 जूनच्या आमच्या पहिल्या आंदोलनात अभिजीत अय्यर-मित्रा यानेच मयंक नावाच्या एका मुलाला पाठवले होते. त्या मुलाने जाणीवपूर्वक दंगल भडकावण्याच्या उद्देशाने भारतविरोधी विधाने केली होती. जेव्हा राईट विंगच्या लोकांनी त्याला शोधायला सुरुवात केली, तेव्हा अभिजीतनेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार एफआयआर दाखल करण्याची तक्रार दिली होती, पण दिल्ली पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही,” असे त्या म्हणाल्या. यावर आशुतोष रांका यांनी दिल्ली पोलिसांना विनंती केली की, “जे पोलीस 15-15 वर्षांच्या मुलांना त्रास देत आहेत, त्यांनी सातत्याने आमचे आंदोलन बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि चिथावणी देणाऱ्या अभिजीत अय्यर-मित्रावर थेट ‘यूएपीए’ (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करावा.” संसदेतही उचलला मुद्दा सौरव दास यांच्या घरात झालेल्या या घुसखोरी प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली. तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांनी सौरव दास यांच्या सुरक्षेच्या चिंतेची दखल घेत हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला. सध्या नीट (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिल्याने सौरव दास आणि त्यांची ‘कॉकरोच जनता पार्टी’ देशभरात चर्चेत आहेत. आता या घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. अभिजीत दिपके म्हणाले- CJP सध्या राजकीय पक्ष बनणार नाही: दबावगटासारखे काम करू; देशाला नवा पक्ष नव्हे, मजबूत जनआंदोलनाची गरज! नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच, देशातील विविध संस्थांची ‘अकाउंटेबिलिटी’ (उत्तरदायित्व) आणि ‘निष्पक्षता’ परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास, यतीन गोयल , वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रंका हे पदाधिकारी उपस्थित आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
'सीजेपी'चे प्रवक्ते सौरव दास यांच्या दिल्लीतील घरात घुसखोरी:संसदेतही उचलला मुद्दा, आशुतोष रांका यांचे पोलिसांना तातडीने कारवाईचे आवाहन