![]()
निसर्गाची अवकृपा, बदलणारे हवामान आणि तीव्र पाणीटंचाईमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी अशोक संपत वराडे यांनी पिकावरील वाढती रोगराई आणि पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे आपली एक एकर क्षेत्रातील शिमला मिरचीचे पीक स्वतःच्या हाताने उपटून टाकले आहे. यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक संकट गडद झाले आहे. शेतकरी अशोक वराडे यांनी यंदाच्या हंगामात मोठ्या आशेने एक एकर क्षेत्रात शिमला मिरचीची लागवड केली होती. लागवडीपासून ते खते, औषध फवारणी आणि मशागतीसाठी त्यांनी आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला होता. मात्र, सुरुवातीपासूनच निसर्गाने साथ दिली नाही. हवामानातील सततच्या बदलामुळे मिरची पिकावर ‘चुरडा-मुरडा’ आणि इतर घातक रोगांचा प्रादुर्भाव झाला. रोगनियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यातच यंदा पावसाने दगा दिल्यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे पिकाला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी लाखो रुपये कर्ज काढून आणि घाम गाळून पीक उभे केले होते. पण रोगराई आणि पाण्यासाठी डोळ्यांदेखत पीक जळताना पाहण्यापेक्षा ते उपटून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. शासनाने आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी. – अशोक संपत वराडे, शेतकरी
Source link
सारोळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे मिरचीचे पीक काढण्याची वेळ:केलेला खर्चही पदरी पडेना, शासनाने पंचनामे करण्याची होतेय मागणी