Headlines

सुप्रिया सुळेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्ष टोला:माघारीच्या निर्णयावरून मविआमध्ये मतभेद उघड; वक्तव्याची राजकीय चर्चा




राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या हालचालींना आता अंतर्गत मतभेदांची किनार मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी माघारीच्या निर्णयावरून विरोधी आघाडीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. नाव न घेता त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकांबाबत गंभीर आरोप केले होते. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीपेक्षा घोडेबाजाराचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे उत्साह आणि लोकसहभाग या निवडणुकांमध्ये दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. वाढत्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चांमुळेच महाविकास आघाडीने पुण्यातील निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान, नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्या विधानावर भाष्य केले. लोकशाहीला पूरक नसलेल्या पद्धतींचा वापर करून अनेकांना माघार घ्यायला भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच संदर्भात बोलताना, मतांची बेरीज नसेल तर निवडणूक का लढायची, असे म्हणणारेही आमच्यात आहेत, असे विधान त्यांनी केले. या वक्तव्यामुळे आघाडीतील विविध पक्षांमध्ये माघारीच्या निर्णयावर एकमत नसल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. नाशिक मतदारसंघातील उमेदवारी न देण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना थोरात यांनी हा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत विचारपूर्वक घेतला गेला असावा, असे सांगितले. या निर्णयामागे काही ठोस राजकीय रणनीती असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या स्थानिक समीकरणांचा विचार करूनच हा निर्णय झाला असावा, असेही त्यांनी नमूद केले. अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी महायुतीतील परिस्थितीवरही भाष्य केले. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीतही संभ्रम असल्याचा दावा त्यांनी केला. कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणत्या उमेदवारामागे उभे राहायचे, याबाबत सत्ताधारी आघाडीत स्पष्टता नसल्याचे ते म्हणाले. मात्र सुप्रिया सुळे आणि बाळासाहेब थोरात यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. आगामी काळात या मुद्द्यावर आघाडीतील नेते कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *