![]()
दारूच्या नशेत बुडालेला पिता, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातावरचे पोट या विवंचनेला कंटाळून आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न आत्याचा मुलगा असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाशी लावून देण्याचा घाट घातला. साखरपुड्याच्या निमित्ताने २५० वऱ्हाडी गोळा झाले
.
दिघी गावातील अल्पवयीन मुलीने दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवले आहेत. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, मात्र तिचे वडील मद्यपी असून, घरात हलाखीची परिस्थिती आहे. यामुळे मुलीच्या आईने नणंदेच्या मुलासोबत तिचे लग्न जुळवले. गरिबीमुळे स्वतंत्र लग्नाचा खर्च परवडणारा नसल्याने रविवारी आयोजित साखरपुड्याच्या कार्यक्रमातच २५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याचे नियोजन केले होते.
आईला अश्रू अनावर
ऐन लग्नाच्या वेळी पोलिस मंडपात शिरल्याने वऱ्हाडी आणि गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने लग्नविधी थांबवून मुलीच्या आईकडे चौकशी केली असता, ‘नवरा प्रचंड दारू पितो, आम्ही हातावर पोट असलेले शेतकरी आहोत. मुलीचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून जवळच्या नात्यात लग्न ठरवले,’ असे सांगत आईला रडू कोसळले.
… अन् यंत्रणा हलली बालविवाह होत असल्याची कुणकुण एका सजग नागरिकाला लागली. लग्न लागण्यास अवघी २० मिनिटे बाकी असताना त्यांनी तातडीने चाइल्ड लाइन आणि पोलिसांच्या ‘डायल ११२’ वर संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत कंट्रोल रूमला माहिती देऊन वाळूज पोलिस ठाण्याचे पीएसआय गोरे, ‘डायल ११२’चे अंमलदार राजपूत, त्रिभुवन, हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे आणि दिघी गावचे ग्रामविकास अधिकारी काळवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.