![]()
तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे तीव्र पाणीटंचाईमुळे आदिवासी बांधवांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ४५ जार शुद्ध पिण्याचे पाणी गावात पोहोचविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा
.
शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत असल्याने नागरिकांसमोर स्वतः प्यायचे की जनावरांना पाजायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती समजल्यानंतर टिटोली येथील समाजसेवक तथा पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे मालक मोहन बोंडे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी नगरसेवक भूषण जाधव यांच्याशी संपर्क साधून खैरेवाडीतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नगरसेवक राज जावरे, रोहिदास डावखर यांच्या सहकार्याने ४५ जार शुद्ध पिण्याचे पाणी घेऊन पथक खैरेवाडीकडे रवाना झाले. गाव अतिदुर्गम भागात असल्याने इगतपुरी वनविभागाचे वनरक्षक कैलास पोटिंदे आणि अश्विनी पाटील यांनी मार्गदर्शन करून पथकाला सुरक्षितपणे गावापर्यंत पोहोचवले. पाणी पोहोचताच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. कैलास पोटिंदे, अश्विनी पाटील, इंद्रजीत गुप्ता तसेच वनमजूर बाळू भुरबुडे यांनी नागरिकांना भांड्यामध्ये पाणी भरून दिले. एकादशीच्या दिवशी शुद्ध पिण्याचे पाणी मिळाल्याने आदिवासी माता-भगिनींनी सर्व मदतकर्त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.