![]()
तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेल्या एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुदेव नगर येथील पाण्याच्या टाकीमागील भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भटकंती करत असलेल्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांच्या कळपाने घेरले व त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या दरम्यान कुत्र्यांनी पिल्लाच्या पायचे पोटाचे लचके तोडल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व प्राणीप्रेमींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमी पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, उपस्थित नागरिक व प्राणी मित्रांनी तत्काळ तिवसा वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली. मात्र, तब्बल दीड तास उलटूनही वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये यादरम्यान नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर प्राणी मित्रांनीच पुढाकार घेत जखमी हरणाच्या पिल्लाला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन तिवसा येथील वन विभाग कार्यालयात नेले. सध्या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत आटत चालले असून वन्यजीवांना पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. परिणामी अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाने जखमी हरणाच्या पिल्लावर तातडीने उपचार करावेत तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
Source link
पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात