![]()
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी बस सेवा १८ मेपा
.
माजी मंत्री तथा आदिवासी मधुकरराव पिचड यांनी या भागातील पर्यटन आणि जनसेवेसाठी ही मुक्कामी बस सेवा सुरू केली होती. मात्र, काही महिन्यांपासून ती बंद असल्याने दुर्गम भागातील जनता पूर्णपणे विस्कळीत झाली होती. समाजसेवक अनंत घाणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून संगमनेर येथून सुटणारी रतनवाडी-साम्रद ही मुक्कामी बस पुन्हा सुरू झाली आहे.
या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीचे दुसरे साधन नसल्याने बस बंद असल्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत होता. आजारी रुग्ण, वयोवृद्ध आणि गरोदर मातांचे रुग्णालयात जाणे कठीण झाले होते. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सांदण व्हॅली’ (साम्रद) आणि अमृतेश्वर मंदिरासाठी (रतनवाडी) येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी कोंडी झाली होती. आता ही सेवा सुरू झाल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय दूर झाली आहे. रतनवाडी-साम्रद बस पूर्ववत सुरू करण्यासोबतच या भागातील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, १५ जूनपासून राजूर ते रतनवाडी-घाटघर ही नवीन दुपारची बस सेवा (दुपारी १२.३० वा.) सुरू करण्याचे धोरण अकोले आगाराने आखले आहे. नवीन ‘रिंग रोड’ बससेवेमुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
आदिवासी भागातील प्रवाशांचा गंभीर प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अकोले आगारप्रमुख सुरेश दराडे आणि सहाय्यक बाळासाहेब गंभीरे यांचा समाजसेवक अनंत घाणे व आदिवासी कार्यकर्त्यांच्या वतीने विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले. ही बससेवा आता कायमस्वरूपी सुरू राहील आणि कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही आगारप्रमुख दराडे यांनी दिली. यावेळी सरपंच एकनाथ सारुकते, उपसरपंच भरत झडे, संदीप झडे, तुकाराम सारूकते, सागर रोंगटे, तुकाराम खाडे, रामदास पिचड यांच्यासह वाहतूक नियंत्रक आर. टी. देशमुख व डी. व्ही. खाडे उपस्थित होते.
रतनवाडी मुक्कामी बस ^ संगमनेर येथून ३.३० वाजता सुटून राजूर मध्ये ५ वाजता व शेंडी येथे ५.३० वाजता पोहोचेल. ती रतनवाडी येथे मुक्कामी ६.३० वाजता येईल. सकाळी मुक्कामाच्या ठिकाणावरून ६.३० वाजता निघून शेंडी, राजूर, अकोले मार्गे संगमनेरला ९.३० वाजता पोहोचेल. निवेदनानुसार संगमनेर ते रतनवाडी-सांम्रद अशी बस सेवा सुरू राहील. यामुळे आदिवासी परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. – सुरेश दराडे, अकोले आगार व्यवस्थापक.