![]()
पावन अधिकमासानिमित्त संत सद्गुरू श्रीविठोबादादा महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 28 मे ते 3 जून 2026 या कालावधीत एन-8, सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ असलेल्या ‘सप्तपदी मंगल कार्यालय, अयोध्या नगर, येथे पार पडणार आहे. समस्त सद्गुरू श्रीचातुर्मास्यमहाराज गुरुभक्त परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत सद्गुरू विठोबादादा महाराज चातुर्मास्ये हे संत भानुदास महाराजांचे अवतार मानले जातात. संतकवी दासगणू महाराज यांनीही आपल्या रचनेत “तु पूर्वजन्मामाझारी भानुदास होतास” असे लिहून याला दुजोरा दिला आहे. सतराशेच्या शतकात जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र अन्वा (ता. भोकरदन) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्याच वढोद गावी श्री मुरलीधर कुलकर्णी यांच्याकडे झाले, जिथे त्यांनी संस्कृत, व्यवहारलेखन, श्रीमद्भागवत आणि गीतेचे सखोल अध्ययन केले. ‘चातुर्मास्ये’ पदवी आणि पांडुरंगाचा चमत्कार संत विठोबादादा महाराजांनी सलग 12 वर्षे पंढरीची वारी केल्यानंतर खुद्द श्रीविठ्ठलाने त्यांना सहकुटुंब ‘चातुर्मास्य’ वारी करण्याची व कीर्तनसेवा करण्याची आज्ञा दिली. पंढरपूर येथील त्यांच्या कीर्तनाला भाविकांची अलोट गर्दी होत असे. त्यांच्या भक्तीची ख्याती सांगणारी एक अद्भूत कथा इतिहासात जोडलेली आहे. एका वारीच्या वेळी एका वृद्ध आजीने गर्दीमुळे दर्शन न मिळाल्याने देवाच्या चरणी एक नारळ अर्पण केला होता. तो नारळ मंदिरातील पुजाऱ्यांनाही काढता येत नव्हता. शेवटी पुजाऱ्यांना दृष्टांत झाला की, हा नारळ माझ्या लाडक्या विठोबा दादा चातुर्मास्ये यांचा आहे. जेव्हा विठोबादादांनी मंदिरात येऊन देवापुढे पदर पसरला, तेव्हा तो नारळ चटकन त्यांच्या पदरात पडला. या चमत्कारानंतर संपूर्ण पंढरपुरात सद्गुरु विठोबा दादामहाराज की जय, असा जयघोष झाला आणि त्यांना ‘चातुर्मास्ये’ हे नाव मिळाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आर्याकार मोरोपंतांशी स्नेह सद्गुरु दादा महाराजांनी मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात भागवत धर्माचा मोठा प्रचार-प्रसार केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांना आदराने महेश्वर नगरीत नेले होते, तर आर्याकार महाराष्ट्रकवि मोरोपंत हे आपले कोणतेही काव्य सद्गुरु विठोबादादांना दाखवल्याशिवाय प्रकाशित करत नसत, इतका त्यांचा घनिष्ठ स्नेह होता. 36 वर्षे चातुर्मास सेवा केल्यानंतर त्यांनी श्रावण वद्य त्रयोदशीला पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर समाधी घेतली. संतश्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये संस्थान श्रीक्षेत्र अन्वा व पंढरपूर चे पंधरावे पीठाधिश प.पू.सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये कथा निरूपण करणार आहेत. असा असेल दैनंदिन कार्यक्रम कलावंतांची संगीत साथ या चरित्र कथेला संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंतांची साथ लाभणार आहे. यामध्ये पखवाज वादक म्हणून ह.भ.प.श्री.रोहित तरंगे चाकाटीकर, हारमोनियम वादक म्हणून ह.भ.प.श्री. पोपट दसुरकर आणि गायक म्हणून ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर माऊली तायडे लोहारखेडा हे सेवा रुजू करणार आहेत. 3 जून रोजी महाप्रसादाने सांगता या चरित्र कथेचा प्रारंभ 28 मे 2026 (गुरुवार, अ. ज्येष्ठ शु. 12) रोजी होणार असून, सांगता 3 जून 2026 (बुधवार, अ. ज्येष्ठ व. 3) रोजी संध्याकाळी भव्य महाप्रसादाच्या वाटपाने होणार आहे.
Source link