![]()
कर्जत–लोणावळा घाट विभागात झालेल्या भूस्खलनानंतर विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भुसावळ मंडळातील मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. मुसळधार पाऊस, डोंगरकड्यांवरून सतत कोसळणारा मलबा व चिखल अशा धोकादायक परिस्थितीतही या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या याच धाडसामुळे रेल्वेमार्गावरील मलबा हटविण्याचे काम वेगाने पूर्ण झाले. रेल्वेने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करत विविध मंडळांतील ट्रॅकमन कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण केले. यामध्ये मनमाडच्या कर्मचाऱ्यांनी कठीण भौगोलिक परिस्थितीत अहोरात्र काम करून कर्तव्य चोख बजावले. अनेक दिवस काम करत असलेल्या या कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळावी, यासाठी एनआरएमयू रेल्वे कर्मचारी संघटनेचे महामंत्री वेणू पी.नायर यांनी भुसावळ मंडळ समितीला ‘रिप्लेसमेंट प्रणाली’ राबविण्याच्या सूचना दिल्या; जेणेकरून थकलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त होऊन काम अखंड सुरू राहील. अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस-रात्र एक करून रेल्वे मार्ग सुरळीत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान केवळ रेल्वे सेवा पूर्ववत करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यामागेही त्यांच्या परिश्रमांचा मोठा वाटा आहे.
Source link
मदतकार्य:कर्जत-लोणावळा घाटात भूस्खलनानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम