Headlines

सोलापूरमधील शिवसेना-भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर!:पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही- उदय सामंत




शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला दमबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अशा धमक्यांनी शिवसेना कधीही नामोहरम होणार नाही, असा सणसणीत टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मित्रपक्षाला सुनावण्यासोबतच स्वपक्षातील नेत्यांनाही खडेबोल सुनावताना, केवळ ‘सोमवार टू सोमवार’ मुंबईत येऊन आपली राजकीय दुकानदारी थाटू नका, अशा कडक शब्दांत सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. टेंभुर्णी येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांसह मित्रपक्षालाही चांगलेच खडेबोल सुनावले. केवळ ‘सोमवार ते सोमवार’ मुंबईत येऊन राजकीय दुकानदारी करणारे आणि ‘अनिवासी भारतीयां’सारखे वागणारे पदाधिकारी पक्षाला अजिबात उपयोगी नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही खपवून घेणार नाहीत, अशा कडक शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. सोलापूरमधील शिवसेना-भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जर कोणी दमबाजी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल, तर ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. यासंदर्भात आपण सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊनच जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामंत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उदय सामंतांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा आम्हीदेखील सत्तेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विचारधारेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, कोणीही सोलापूर जिल्ह्यातील आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या द्याव्यात. असे प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा उदय सामंत यांनी दिला. असल्या पोकळ धमक्यांनी शिवसेना कधीही नामोहरम होत नसते, असे ठणकावून सांगत त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच अप्रत्यक्षपणे लक्ष केले आहे. सामंत यांच्या या उघड इशाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे आणि त्यांच्यातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या 17 जागा आम्हीच जिंकू विधान परिषदेच्या आगामी 17 जागांच्या निवडणुकीसाठी आज रात्रीपर्यंत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येईल आणि या सर्वच्या सर्व 17 जागा आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोकणात शिवसेनेचे मतदार सर्वाधिक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे दावा सांगितला आहे. मात्र निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी होतच असतात, असे सांगत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित चर्चा करून यातून निश्चितच योग्य तो मार्ग काढण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. जागावाटपावरून सध्या अनेक वावड्या उठत असल्या तरी, जेव्हा आम्ही प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरू, तेव्हाच जागांचा अंतिम आकडा सर्वांसमोर स्पष्ट होईल, असेही ते शेवटी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *