![]()
चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव-सैदापूर येथील ३४ बाधित कुटुंबांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. १९ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई व मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप ३४ बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नाही. गावातील उपलब्ध शासकीय जागेवर पुराचा धोका असल्याने योग्य पुनर्वसन होऊ शकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मौजा फुबगाव येथील वर्ग-१ गट क्रमांक १०९ व ११० चे मालक रमेश भगवंतराव चीचखेडे यांनी पुनर्वसनासाठी स्वतःची शेती देण्याची लेखी तयारी तहसीलदारांकडे दर्शविली आहे. या मागणीसाठी बाधित कुटुंबांनी २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ दरम्यान तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी प्रस्ताव पाठवून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित कुटुंबांनी पुन्हा १ जून २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी श्रीकृष्ण वऱ्हाडे, निरंजन कुरवाडे, दिलीप वऱ्हाडे, उत्तमराव वऱ्हाडे, राजू बोरवार, दादाराव वऱ्हाडे, भारत वऱ्हाडे, विलास वऱ्हाडे, रमेश भानगे, रोशन वऱ्हाडे, देविदास वऱ्हाडे, अशोक वऱ्हाडे, निलेश वऱ्हाडे आदी उपस्थित होते. सध्या काही कुटुंबे जिल्हा परिषद शाळेत, तर एक कुटुंब समाज मंदिरात राहत आहे. उर्वरित कुटुंबे जीव मुठीत धरून त्याच धोकादायक परिसरात वास्तव्य करत आहेत. आगामी पावसाळ्यात पुन्हा दरड कोसळून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
फुबगाव येथील ३४ बाधित कुटुंबांचा १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा:पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले, प्रशासनाकडे केली मागणी