Headlines

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा:म्हाडाच्या पदावरून नवा वाद; विरोधाला आनंद परांजपेंचं शांत पण ठाम उत्तर




राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आणखी एका पत्रामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रात शिवसेना नेते आनंद परांजपे यांची एका महत्त्वाच्या पदावर होणारी नियुक्ती थांबवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आनंद परांजपे यांना म्हाडाच्या उपाध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र, या नियुक्तीला विरोध करत सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याचं बोललं जात आहे. या पत्रात परांजपे यांना हे पद देऊ नये आणि त्याऐवजी दुसरं नाव सुचवण्यात येईल, असं नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि जागावाटपाच्या चर्चांमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आनंद परांजपे हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी 14 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत दाखल होताच त्यांचं नाव म्हाडाच्या महत्त्वाच्या पदासाठी चर्चेत आलं आणि त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या पत्राची माहिती समोर आल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आनंद परांजपे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली. मी 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. त्यामुळे कुणी पत्र दिलं म्हणून माझ्या मनात कुठलीही कटुता नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तसेच, मी आता शिवसेनेत स्वगृही परतलो आहे. पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. इथे मला कोणत्याही पदाचं आश्वासन देण्यात आलेलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं. देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आनंद परांजपे यांनी अजित पवारांविषयीही आदराची भूमिका कायम ठेवली. अजितदादा हे माझं श्रद्धास्थान आहेत. मी पक्ष सोडला म्हणून कुणावर टीका करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एका बाजूला सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे निर्माण झालेली राजकीय चर्चा आणि दुसऱ्या बाजूला परांजपेंची मवाळ प्रतिक्रिया यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रावर आणि म्हाडा नियुक्तीवर नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *