![]()
शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या तारा तुटल्या. प्रवाह खंडित झाला. या खंडित प्रवाहामुळे अनेक भागात उशीरा रात्रीपर्यंत काळोख होता. गरमीचे साम्राज्य होते. भातकुली – शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास भातकुली शहर व परिसराला चक्रीवादळ, गारपीट, पावसाचा जोरदार फटका बसला. मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या विद्युत तारा व विजेच्या खांबांवर पडल्या. खांब वाकले. शहरातील शांतीनगरलगत असलेल्या गौरक्षणातील टिनपत्रे उडून आल्यामुळे शांतीनगरातील अनेक घरांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शहरातील रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या उचलण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडूनही खांब व तारांवर पडलेल्या फांद्या हटवण्यात येत आहेत. मोर्शीतील दाभेरी शेतशिवारात गारपीट मोर्शी – तालुक्यातील दाभेरी शेतशिवारात दुपारी तीनच्या सुमारास गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा सुटला. खेड फाटा ते खेड गावाच्या रस्त्यावरील झाडे कोलमडली. वाहतूक विस्कळीत झाली. काही शेतकऱ्यांच्या झोपड्यांवरील टीनपत्रे उडाली. दरम्यान दाभेरी ते तळेगाव परिसरात तुरीच्या दाण्यापेक्षा मोठी गार कोसळली. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा कहर सुरू होता. याच काळात काही शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडींवरील टीनपत्रे उडाली. रखवालदारांचा संसार उघड्यावर आला.
Source link
गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली