![]()
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा ‘बंडखोर’ उमेदवारांनीच नेत्यांची झोप उडवली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला इच्छुकांनी पक्षादेश झुगारून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी अपक्ष किंवा समांतर अर्ज भरल्याने आघाडी धर्मासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः महायुतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण अधिक असल्याने, आता बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. महायुतीमध्ये कुठे-कुठे बंडखोरी? महायुतीमध्ये अनेक जागी घटक पक्षांनी एकमेकांच्या उमेदवारांना आव्हान दिले आहे. रायगड: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरवले असले, तरी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करत आपला देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना: भाजपने सुहास शिरसाठ यांना तिकीट दिले आहे, मात्र येथे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंड पुकारत अर्ज भरला आहे. यवतमाळ: शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीकडून साजिद बेग यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत चतुर्वेदींना आव्हान दिले आहे. पुणे व अमरावती: पुण्यात राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंविरोधात भाजपचे प्रदीप कंद, तर अमरावतीत भाजपच्या प्रवीण पोटे यांच्यासमोर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया उभे ठाकले आहेत. नाशिक व परभणी: नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंविरोधात अपक्ष गिते बंधूंनी (गोकूळ आणि गणेश गिते) दंड थोपटले आहेत. परभणीत शिवसेनेच्या सईदा खान यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या जामकर पिता-पुत्रांनी (विजय आणि संग्राम जामकर) बंड केले आहे. नांदेड: भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आव्हान दिले आहे. योग्य तोडगा काढू – एकनाथ शिंदे या बंडखोरीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ जून आहे. तोपर्यंत आम्ही सर्व बंडखोरांशी चर्चा करून त्यांची मनधरणी करू. ही निवडणूक महायुती एकदिलानेच लढेल आणि योग्य तोडगा काढला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ४ जूनपर्यंत किती बंडखोर आपले अर्ज मागे घेतात आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला मान देतात, यावरच अनेक मतदारसंघातील विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. महाविकास आघाडीतही बंडाचे निशाण बंडखोरीचे हे वारं केवळ महायुतीपुरते मर्यादित नसून महाविकास आघाडीतही अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. नांदेड: काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास सुमठाणकर असले, तरी माधवगाव जवळकर आणि ठाकरे गटाचे कृष्ण आष्टीकर यांनी समांतर अर्ज भरल्याने पेच निर्माण झाला आहे. भंडारा-गोंदिया: काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना संधी दिली असताना नरेश ईश्वरकर आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज भरल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सांगली: शरद पवार गटाने बाळासाहेब पाटलांना मैदानात उतरवले आहे, मात्र काँग्रेसच्या संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.
Source link
महायुतीसह महाविकास आघाडीला 'बंडा'चे ग्रहण:विधानपरिषदेच्या रिंगणात इच्छुकांनी थोपटले दंड; कुठे-कुठे बंडखोरी? वाचा सविस्तर