![]()
प्रतिनिधी | अमरावती बाल मनावर उत्तम संस्कार घडवून त्यांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनवण्यासाठी वडाळी येथे १० दिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून येथे त्यांना विविध व्यायाम, आत्मरक्षण, योगासनांचे धडे दिले जात आहेत. १ ते १० जून दरम्यान चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांच्या हस्ते वडाळी येथील राजपूत समाज मंदिर येथे करण्यात आले. शिव प्रभात शाखेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनपर भाषणात मार्गदर्शन करताना महानगर संघचालक बापोरीकर म्हणाले की, लहानपण हे मातीच्या गोळ्यासारखे असते, त्याला आपण जसा आकार देऊ, तशीच त्याची आयुष्यभर जडणघडण होते. संस्कार हा आजच्या काळातील अनमोल ठेवा असून तो आपण सर्वांनी जपला पाहिजे. शिबिरार्थींनी या १० दिवसांतून जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी आत्मसात करून आपल्या आयुष्यात सुधारणा करावी. तसेच, पालकांनी स्वतःच्या मुलांसोबतच इतरही मुलांना अशा शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. या १० दिवसांच्या कालावधीत परिसरातील बालकांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरात प्रामुख्याने शारीरिक विकासासाठी दंड (लाठी), नियुद्ध (कराटे), योग आणि समता हे विषय शिकवले जातील. तर बौद्धिक विकासासाठी रोज वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. विविध खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये एकीची आणि नेतृत्वाची भावना निर्माण होण्यासाठीब वेगवेगळ्या खेळांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. या संस्कार शिबिरामध्ये वडाळी आणि प्रामुख्याने परिहार पुरा परिसरातील सुमारे ४५ मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. येत्या १० दिवसांत या बालकांना विविध कला आणि कौशल्यांचे धडे मिळणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी रा.स्व.संघ नगर विस्तारक प्रणव अमृतकर, महानगर बाल कार्यवाह अजिंक्य देशपांडे, नगर कार्यवाह सुनील गुंडे, नितीन गोंधळेकर, विजय माने, प्रफुल्ल बोके, संजय चव्हाण, सचिन तुप्पट, पवन चिंचोळकर यांच्यासह परिसरातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिव प्रभात शाखेचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. शाळा सुरू होण्याआधी बालकांवर संस्कार शाळा हे विद्येचे मंदिर आहे. सध्या बालकांना वाढलेल्या अभ्यासक्रमामुळे इतर आवडी-निवडी जपण्यासाठी वेळच मिळत नाही. मिळाला तरी तो केवळ सुटीच्या दिवशी मिळतो. त्यातही शिकवणी वर्गात त्यांचा वेळ जातो. ते बघता शाळा सुरू होण्याआधी बालकांवर संस्कार व्हावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे बालकांवर सुसंस्कार होण्यासोबतच त्यांना योग्य दिशाही मिळते. ज्यामुळे ते विविध खेळ, विविध कला, आत्मरक्षणासाठी मार्शल आर्ट, लाठीकाठी, शरीर बलवान बनवण्यासाठी योगासने शिकतात. यामुळे त्यांना व्यक्तिमत्व विकास घडवण्यास मदत मिळते.
Source link
बालकांना शारीरिक, मानसिक अन्बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे धडे:वडाळी येथे १० दिवसीय बाल संस्कार शिबिराचा प्रारंभ