![]()
सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. एका मित्राला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्यात ओढले गेले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. मृत झालेली तिन्ही मुले ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. यश ज्ञानेश्वर बारबैले (१६, रा. लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसर), आदर्श गौतम इंगोले (१५, रा. बाराघर, सातारा परिसर), विशाल मच्छिंद्र घुले (१५, रा. बाराघर, सातारा परिसर) असे मृतांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ सर्व मित्र सकाळी जमले होते. त्यांनी पोहण्यासाठी जाण्याचा बेत आखला. आदर्श आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावावर पोहोचले होते. त्यानंतर सहाही मुले तलावात उतरली, मात्र पाण्याचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने एक मुलगा अचानक बुडू लागला. ही गोष्ट लक्ष्यात येताच बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी बाजूचे दोघे पुढे सरसावले, परंतु पाणी जास्त असल्याने ते दोघेही पाण्यात ओढले गेले आणि तिघांचाही मृत्यू झाला. लोकांना उर्वरित दोन मुलांना वाचवण्यात यश आले. सकाळी आई रुग्णालयातून घरी, सायंकाळी मुलाचा अंत यश ज्ञानेश्वर बारबैले (१६, रा. लक्ष्मी कॉलनी) हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. दुर्दैव म्हणजे त्या आजच आजारपणातून बऱ्या होऊन घरी परतल्या आणि त्यांच्यासमोरच पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाला. आदर्श इंगोले (१५, रा. बाराघर) याचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न होते. तो त्यासाठी कसून तयारी करत होता. विशेष म्हणजे आजच त्याच्या काकांनी अत्यंत आशेने त्याचा देवगिरी महाविद्यालयात ११ वीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, कॉलेजचा पहिला दिवस पाहण्यापूर्वीच त्याचा अंत झाला. विशाल मच्छिंद्र घुले (१५) हा सातवी उत्तीर्ण होता व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मंडप बांधणीचे काम करत असे. त्याचे वडील प्लंबिंगचे काम करतात. ६ भावंडांमध्ये तो एक होता.
Source link
साई टेकडी परिसरातील तलावात 3 जण बुडाले:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले