![]()
माळशिरस तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस या अवकाळी आणि वादळी पावसामुळे तालुक्यातील फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांच्या शेतातील पेरूची बाग आणि गवारीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटामुळे निटवे यांच्या डोळ्यात अश्रू आले असून ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड असतानाही, फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, पाण्याचे नियोजन करून आपली पेरूची बाग आणि गवारीचे पीक जिवापाड जोपासले होते. उन्हाळ्याच्या कडक हंगामात घेतलेली मेहनत आता कुठे फळाला येत असतानाच, रविवारी आणि सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पेरूची छोटी आणि कोवळी झाडे वाऱ्याच्या वेगाने उन्मळून पडली आहेत, तर गवारीचे पीकही जमिनीदोस्त झाले आहे. यामुळे निटवे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या या अतोनात नुकसानामुळे शेतकरी अजय निटवे संकटात सापडले असून, त्यांनी प्रशासनाकडे आर्त हाक मारली आहे. महसूल विभाग आणि कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ फोंडशिरस येथील त्यांच्या शेतावर जाऊन या नुकसानीची पाहणी करावी.
Source link
फोंडशिरस येथे पेरूची बाग अन् गवारीचे पीक भुईसपाट:सलग दोन दिवस वादळी पावसाचा तडाखा