![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन हा 10 जून रोजी साजरा केला जातो. मात्र महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे अजित पवार गटाने हा सोहळा आज साजरा केला. अजित पवारांच्याशिवाय हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पक्ष नाही तर ती संस्था आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे. हा पक्ष वाढवताना ज्यांनी रक्ताचे पाणी केले ते अजितदादा आपल्यात नाहीत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या चरणी निष्ठा वाहायच्या आहेत, असे भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे. सुनील तटकरेंना टोला खासदार सुनील तटकरे यांनी भाषणात ‘कबड्डीपटू’ म्हणून केलेल्या उल्लेखावर बोलताना छगन भुजबळांनी त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कुणी मोठे नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही तर तो कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. त्यामुळे पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. पदे म्हणजे आळवावरचे पाणी, कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्या निष्ठा आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहायच्या आहेत. शरद पवारांचा पुतळा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला शरद पवारांचा दाखला देत छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांना काँग्रेसमधून काढण्यात आले. त्यावेळी हे प्रकरण त्यांना सहज मिटवता आले असते. पण तसे झाले नाही. त्यानंतर इतिहास घडला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळी घड्याळ हे चिन्ह आपल्याला मिळाले. 19 मे 1999 रोजी, काही नेते मला भेटायला आले. ते सगळे रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी पवार साहेबांचा पुतळा काही काँग्रेसवाले जाळत होते, तो पुतळा आमच्या लोकांनी जाळू दिला नाही. त्यावेळी ते जखमी झाले. ती घटना आजदेखील मला आठवते. मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेसकडून ऑफर काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी मला काँग्रेसमधून अनेकांचे फोन आले. तुम्ही काँग्रेसमध्ये या, आजच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करतो अशी ऑफर देण्यात आली. पण मी ती नाकारली. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी पवार साहेबांना साथ दिली. आज हा पक्ष वाढवला याचा आनंद मला आहे. अजितदादांचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत छगन भुजबळ म्हणाले, हा पक्ष वाढवत असताना ज्यांनी रक्ताचे पाणी करून काम केले, अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. सत्ता हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. त्यासाठी राजकारण करायचे आहे.
Source link
छगन भुजबळांचे विधान:म्हणाले- ज्या निष्ठा अजितदादांच्या चरणी वाहिल्या, त्या आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहा